Swapnil SK
10/07/2025
रक्ताचे डाग फक्त भिंतीवर नव्हते... ते महाराष्ट्राच्या काळजात होते !
मासिक पाळी – ही स्त्रीच्या शरीरातील एक नैसर्गिक, जैविक प्रक्रिया. पण दुर्दैवाने आपल्या समाजात अजूनही मासिक पाळी म्हणजे लाज, अपराध आणि अस्वस्थता यांचे प्रतीक मानले जाते. नुकतीच समोर आलेली आर. एस. दमानिया शाळेतील घटना हेच सत्य भेदकपणे अधोरेखित करते.
स्वच्छतागृहात भिंतीवर आढळलेले रक्ताचे डाग हे कोणत्याही संवेदनशील, सुजाण व्यवस्थेसाठी चिंता व्यक्त करण्याचे निमित्त ठरले असते. पण इथे काय झालं ?
भयावह, अमानवी आणि अपमानास्पद कृती — सहावी ते दहावीच्या विद्यार्थिनींची कपडे उतरवून तपासणी करण्यात आली... केवळ कोणत्या मुलीला मासिक पाळी आली आहे हे शोधण्यासाठी!
हे शिक्षण आहे की सामाजिक छळ ?
ही शाळा आहे की अन्यायाचं व्यासपीठ ?
शाळा म्हणजे व्यक्तिमत्त्व घडवण्याचं केंद्र. पण इथे मुलींच्या आत्मसन्मानावर थेट आघात झाला. शिक्षिका आणि महिला कर्मचाऱ्यांनी तपास केला हे सांगण्यात आलं, पण कोणत्याही परिस्थितीत विवस्त्र तपासणी ही क्षम्य ठरू शकत नाही.
अशा प्रसंगाचा मानसिक आणि सामाजिक आघात किती खोलवर जातो, याची कल्पनाही न केलेली बरी.
त्या निरागस मुलींना आपल्या शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियेसाठी अपराधी ठरवणं, त्यांचं जाहीर अपमान करणं, हे आपल्या शिक्षण व्यवस्थेचं निःसंवेदनशील, कोरडं आणि अन्यायी रूप दाखवतं.
इतक्यावरच थांबले नाही...
पाण्याच्या अभावामुळे काही मुलींनी रक्त पुसण्याचा प्रयत्न केला, आणि तो डाग पुढे इतर विद्यार्थ्यांना "प्रोजेक्टरवर" दाखवला गेला!
हे केवळ अन्याय नाही, तर बालहक्कांचा उघड उघड अपमान आहे.
या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या काळजात सल उठली आहे.
शाळेच्या चार भिंतींमध्ये घडलेली ही घटना आता समाजाच्या भिंती हादरवते आहे. संबंधित जबाबदारांवर केवळ चौकशी नव्हे, तर कठोर कारवाई होणे ही काळाची गरज आहे.
- स्वप्नील तानाजी कदम
Click here to claim your Sponsored Listing.