MARG Institute For SELF Development
आजच्या जगण्यातील आव्हाने, त्यामुळे अनुभवास येणारे असमाधान, अस्वस्थता, आणि आपल्या मनाची होणारी अगतिक अवस्था हे सगळं आपण अनुभवतो आहोत. यासाठी आपल्याला मदत करु शकणारा एक परिणामकारक उपाय म्हणजे मानसशास्त्रीय समुपदेशन. आपल्या जगण्यातील विविध अडचणी आणि त्यासाठी समुपदेशनाची होणारी मदत यांचा परिचय करुन देणारी ही लेखमाला सुरु करीत आहे. आपला प्रतिसाद मला हुरुप देणारा असेल.
*मना तळमळसी ...! लेखांक १.*
आधुनिक काळातील माणसाचं जगणं पूर्वी कधी नव्हे एवढं बदललं आहे. आजच्या पिढीचं जगणं आणि आपल्या अगोदरच्या पिढीचं जगणं यात जमीन-अस्मानाचा फरक पडलेला आहे. कॉम्प्युटरच्या एका क्लिकच्या मदतीने इथे भारतात बसलेले आजोबा आपल्या अमेरिकेतल्या नातवाशी सहज गप्पा मारू शकतात. तंत्रज्ञानातील या बदलांचा वेगही अगदी झपाटून टाकणारा आहे. इतका की काल आलेलं तंत्रज्ञान आज कालबाह्य ठरत आहे. पूर्वीच्या शेकडो वर्षांच्या अस्थिर जगण्याने संस्कृती म्हणून स्थापित झालेले माणसाच्या जगण्याचे सारे संकेत आज कालबाह्य ठरावेत अशी परिस्थिती निर्माण होते आहे. बदल, वेग, आणि स्पर्धा हे आजच्या युगाचे परवलीचे शब्द बनले आहेत.
बदल, वेग, आणि स्पर्धेमुळे बाहेरच्या जगाबरोबर माणसाचं भावविश्व सुद्धा कधी नव्हे इतके ढवळून निघालं आहे. त्यामुळे मानसिक, भावनिक, समस्यांचं किंवा त्याहूनही गंभीर अशा मनोविकारांचे आणि मनोकायिक आजारांचे प्रमाण सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढलेलं दिसतं. पाव शतकापूर्वी उच्च रक्तदाब आणि हृदयविकार हे मनोकायिक आजार; हे क्वचित आढळणारे श्रीमंती आजार होते. पण आज पस्तिशीच्या पुढच्या पिढीत सुद्धा हे आजार सहजरीत्या आढळतात. आधुनिक मानसशास्त्राने माणसाच्या जगण्यातील या बदलांची, समस्यांची दखल घेऊन त्यांचा अगदी सूक्ष्मतेने अभ्यास केला. त्या सोडवण्यासाठी अनेक उपचार पद्धती शोधून काढल्या. त्यातलीच एक प्रभावी उपचारपद्धती म्हणजे मानसशास्त्रीय समुपदेशन (सायकॉलॉजिकल कौन्सिलिंग). या लेखमालेतून आपण याच उपचारपद्धतीची अधिक विस्तृत ओळख करुन घेऊ.
आपण वापरतो ती सर्व वाहने जरी स्वयंचलित असली, तरी ती चालवण्यासाठी चालकाची म्हणजे ड्रायव्हरची आवश्यकता असते. अगदी त्याच प्रकारे आपल्याला ही आयुष्यभर आपलं मन चालवत असतं. गंमत म्हणजे आपल्याला हवं तिथं ते आपल्याला नेईलच याची अजिबात खात्री नसते. त्याला मध्येच कुठेतरी; बरेचदा नको तिथं, गुंतून पडण्याची सवय असते. या प्रवासात लहान-मोठे अपघात तर रोजचेच. म्हणजे आपण ठरवतो एक, आणि आपलं मन आपल्या हातून वेगळीच गोष्ट घडवतं.
आठवण्याचा प्रयत्न करून पहा. कितीतरी वेळा आपल्याला असं वाटतं की आपण असे कसे वागलो..? काहीतरी होतं, कोणीतरी काहीतरी म्हणतं; आणि अगदी अचानक आपण अतिशय स्फोटक रीतीने रिअॕक्ट होतो. आपल्या या रिएक्शनचे परिणाम पुढे बरेचदा फारच वाईट होतात. नंतर आपल्याला असं वाटत राहतं, की आपण असे कसे वागलो? आपल्याला नेमकं काय झालं होतं? किंवा बरेचदा एखादा विचार प्रसंग आपला पिच्छा सोडत नाही. आपल्याला खरं तर तो झटकायचा असतो. पण नाही. सोडतच नाही तो आपल्याला. मग आपल्या वागण्यावर, कामावर त्याचा परिणाम व्हायला लागतो. कौरव-पांडवांच्या दोन सेनासागरांमध्ये निराश होऊन, हातपाय गाळून बसलेल्या अर्जुना सारखीच आपली अवस्था होते अगदी.
आपलं मन आपल्यावर कशी हुकुमत गाजवतं, अन् त्याची वागण्याची पद्धत नेमकी कशी असते, हे समजण्यासाठी आपल्याला मुळातूनच मन ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे. आणि हीच तर सर्वात अवघड कामगिरी आहे. मन समजून घेण्यासाठी तर माणूस हजारो वर्षांपासून प्रयत्न करतो आहे. अध्यात्मिक क्षेत्रातील काही थोर मंडळींना ते उमगले सुद्धा. पण ज्यांना ते उमगलं त्यांच्या हेही लक्षात आलं की हा अगदीच वैयक्तिक आणि व्यक्तिगत अनुभव आहे. इतका, की तो इतरांच्या जाणिवेला आणताच येत नाही. म्हणजे मग तुमच्या माझ्यासारख्या पामराची अवस्था, स्वतःचच शेपूट पकडून पाहणाऱ्या कुत्र्यासारखी होते अगदी. आपण मनाच्या मागे, आणि तो पठ्ठ्या आपला पुढेच.
याच्यावर उपाय सापडला तो आधुनिक मानसशास्त्राला. मनाचा अभ्यास करू पाहणार्या मानसशास्त्रज्ञांच्या हे लक्षात आलं, की ज्याचा अभ्यास करायचा, ते मन, आपल्याला निरीक्षणासाठी उपलब्धच नाही मुळी. मग काय करायचं तर त्यांच्या लक्षात आलं, की मन हे माणसाच्या वर्तनाचं कारक आहे. म्हणजे मन सांगतं आणि माणूस त्याप्रमाणे वागतो. हा संबंध लक्षात आल्यानंतर मग मानसशास्त्र हे मनाचा अभ्यास करणारे शास्त्र राहिलंच नाही. तर ते झालं मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र. आपलं वागणं आणि त्यामागची मूळ गुंतागुंत समजून घेण्यासाठी, आपल्याला मानसशास्त्राचीच मदत घेणे गरजेचे आहे. मानसशास्त्राला हे समजलं की *माणसाचं मन म्हणजे जन्मापासून त्याला आलेल्या बऱ्या वाईट अनुभवातून त्याला झालेल्या ज्ञानाची आणि त्याच्या एकूण मानसिक सवयींची गोळाबेरीज. यातली गम्मत अशी की असं अनुभवातून मिळालेले ज्ञान, म्हणजे त्या अनुभवांचा त्याने लावलेला अन्वयार्थ. आणि हा अन्वयार्थ लावण्यासाठी साधन म्हणून काम करतं, ते अशाच प्रकारे त्यापूर्वी मिळालेले पूर्वसंचित ज्ञान. म्हणून तर एकाच घटनेत सहभागी असणाऱ्या दोन माणसांना तीच एकच घटना वेगवेगळ्या प्रकार हे समजते. त्या एकाच घटनेचा त्या दोघांनी लावलेला अन्वयार्थ वेगवेगळा असू शकतो.
अनेक कारणांनी माणसाच्या मनात आपल्या आसपासच्या जगाच्या होणाऱ्या आकलनात गोंधळ होऊ लागतो. तेव्हा मग त्या माणसाच्या आकलनातील गडबड त्याच्या वागण्यात प्रगट होऊ लागते. अशा विचालित वर्तनाला मानसशास्त्राच्या भाषेत म्हणतात वर्तनसमस्या. वर्तनसमस्यांना कारणीभूत असणाऱ्या मनोवस्थेला मानसशास्त्रात मनोविकार असं म्हटलं जातं. आधुनिक मानसशास्त्राने अशा अनेक साध्या, आणि गंभीर मनोविकारांचा अधिक अगदी सूक्ष्मतेने अभ्यास केला. आणि त्यांचे दोन प्रमुख गट पाडले. पहिला गट म्हणजे सायकोसिस. या गटातील वर्तन समस्या या प्रामुख्याने वैद्यकशास्त्राच्या कक्षेत येणाऱ्या असतात. यांच्या उपचारांसाठी औषधोपचारांची गरज असते. यामध्ये छिन्नमनस्कता (स्किझोफ्रेनिया), किंवा उन्माद, असे अतिगंभीर आजार येतात.
दुसरा गट आहे तुमच्या माझ्यासारख्या संपूर्ण शहाण्या आणि अजिबात आजारी नसणाऱ्या सामान्य माणसांना सतावणा-या छोट्या-मोठ्या मानसिक, भावनिक अडचणी किंवा समस्या. उदाहरणार्थ भीती, चिंता, नैराश्य. वैद्यकीयदृष्ट्या या लोकांना आजारी, म्हणजे मनोरुग्ण असं म्हणता येत नाही. या समस्या अगदी छोट्या छोट्या असतात. पण कधी कधी त्यांचा आपल्या जगण्यावर होणारा परिणाम हा अतिशय गंभीर असू शकतो. त्यामुळे आपल्या जगण्यामध्ये अतिशय गंभीर अशा समस्या निर्माण होऊ शकतात. अशा अगदी नॉर्मल माणसांच्या छोटया आणि गंभीर वर्तनसमस्या सोडवण्यासाठी अतिशय प्रभावीपणे उपयोगी पडणारी उपचार पद्धती, म्हणजे मानसशास्त्रीय समुपदेशन. गंभीर अशा मनोविकारांमध्ये उदाहरणार्थ स्किझोफ्रेनिया ही उपयोगी नसते. ज्या व्यक्तींशी संवाद साधणं शक्य आहे अशाच व्यक्तींना ही उपचार पद्धती उपयोगी पडते. गंभीर मनोविकारांमध्ये हा संवाद शक्य नसतो. आधुनिक जगण्यातील ताणतणाव आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या वर्तन समस्यांना सामोरे जाण्यासाठी फारच प्रभावीपणे या पद्धतीचा उपयोग होऊ शकतो. अशा अनेक मानसिक समस्या आणि त्या सोडवण्यातील मानसशास्त्रीय समुपदेशनाची भूमिका आणि उपयोग, हाच या लेखमालेचा विषय आहे. मानसशास्त्रीय समुपदेशन ही आधुनिक काळातील मानसिक आरोग्याची आणि समाधानी जीवनाची गुरुकिल्ली आहे. समुपदेशन आपल्या आयुष्यात कोणकोणत्या क्षेत्रात कसे उपयोगी पडू शकते याची आपण या लेखमालेमध्ये चर्चा करू.
-- *विवेक दसरे.*
मानसतज्ञ.
*मार्ग काउन्सिलिंग आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सेंटर,*
अहमदनगर.
9881659901
हा लेख फाॕरवर्ड करायचा झाल्यास माझ्या नावासह करायला हरकत नाही.
कोरोनाशी मानसिक लढाई भाग 3
' नेहमी सकारात्मक स्वसंवादांची निवड करा ' या वाक्याने आपण मागील भागाचा शेवट केला. स्वसंवाद म्हणजे आपण स्वतःशी साधलेला संवाद. शब्दांच्या स्वरूपात आपल्या मनात निर्माण होणारे विचार म्हणजे आपले स्वसंवाद.( Affirmations). आपण स्वतःशी जे बोलत असतो त्या बोलण्याने म्हणजेच " स्वसंवादाने " आपला " मूड " तयार होत असतो. पण मग आपण आपल्याशीच चालू असणारा हा स्वसंवाद बदलु शकतो का? त्यांची निवड करता येते का? तर निश्चितच करता येते. आपला मूड सुधारण्यासाठी आपण आपल्याला हवे तसे स्वसंवाद तयार करून त्यांची स्थापना आपण आपल्या मनात करू शकतो याची खात्री बाळगा. हे करायचं कसं ?
त्यासाठी सर्वप्रथम आवश्यकता पडते ती तटस्थपणा आणि निश्चयाची. हे आपल्याला करायचं आहे हा एकदा निश्चय झाला की मग आपण आपल्याला हवं ते करूच शकतो. निश्चय झाल्यावर आपण आता हे शोधू की आपल्या मनात नकारात्मक विचारांची सुरुवात कशी होते. बंदुकीची गोळी झाडायची असेल तर तिचा खटका दाबावा लागतो. त्याला trigger असे म्हणतात. ट्रिगर काय करतो ? तर गोळी सुटण्याची प्रोसेस सुरू करतो. त्याच प्रकारे आपल्या मनातील नकारात्मक विचार ------- सध्याच्या परिस्थितीमध्ये खासकरून कोरोना बद्दलचे विचार---- कशामुळे ट्रिगर होतात ? तर त्याला कारण आहेत आपल्या आसपासची माध्यमे. टीव्ही, आणि फेसबुक, व्हाट्सॲप, म्हणजेच मोबाईल फोन. त्यामुळे टीव्ही आणि मोबाइलचा वापर करताना कोरोनाबद्दलच्या बातम्यांपासून दूर राहा. दिवसभरात एकदाच , आपल्याला स्वतःला आवश्यक तेवढीच माहिती घ्या. क्रिकेट मॅचच्या स्कोअर सारखा दिवसभर कोरोनाच्या नवीन पेशंटचा आणि मृतांच्या आकड्यांचा स्कोअर मांडत बसू नका. व्हॉटसॲपवरील स्वयंघोषित तज्ञांची आपल्याला आवश्यकता नाही. त्याऐवजी मनाला आनंद देणाऱ्या इतर गोष्टी करा.
एवढे करूनही आपल्या मनात वाईट विचार येऊ लागलेच तर काय ? तर मग हे विचार वाक्याच्या स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करा. वाक्याच्या स्वरूपात मांडलेले विचार म्हणजे आपण आपल्याशीच साधत असलेला स्वसंवाद. काय काय म्हणत असतो आपण स्वतःला ? तर असे अनेक विचार असतात. पण खास कोरोनाच्या संदर्भात हे विचार काय असतात ?
आपण असे काही नको असणारे , नकारात्मक विचार , आणि त्यांच्या ऐवजी करण्याचे स्वसंवादात्मक चांगले विचार कसे आहेत ते पाहू. यामध्ये पहिला विचार हा नकारात्मक विचार आहे. आणि त्यानंतरचा दिलेला विचार हा सकारात्मक विचार आहे जो सतत उच्चारण्याने नकारात्मक विचारावर विजय मिळवता येईल.
१) नकारात्मक विचार - काय भयंकर परिस्थिती आहे ही.... आकडा वाढतच चाललाय. मी पण आजारी पडलो तर ..... काय होईल ? अरे देवा ....! अवघडच आहे ...काय करावं बरं..?
या अशा विचारांनी मनात भीती निर्माण व्हायला लागते. तोच विचार सतत मनात घोळत राहिला तर अस्वस्थता यायला लागते.
असा विचार आल्यास पुढील वाक्ये मनाशी सतत म्हणावीत ....
सकारात्मक स्वसंवाद ....परिस्थिती कठीण आहे खरी... आणि मी एकटा ती बदलू शकत नाही हे पण खरे... पण मी एकटा स्वतःला सुरक्षित ठेवू शकतो.... घरात राहून , इतरांशी बाहेरच्या लोकांशी , संपर्क टाळून, मी स्वतः 100% सुरक्षित राहू शकतो. हे नक्की.
2) नकारात्मक विचार - किती कंटाळवाणा काळ आहे हा ...! घरात , म्हणजे जणू तुरुंगातच आहे मी. कोणाला भेटले नाही, काम नाही, मित्र नाही, सहज चक्कर मारायला सुद्धा जाता येत नाही. अगदीच असह्य झालाय हा तुरुंगवास....
सकारात्मक संवाद - सर्व गोष्टींपेक्षा मी जिवंत असणं महत्त्वाचं आहे. कोरोनापासून माझा बचाव होण्यासाठी , मी घरात आहे , तरच मी सुरक्षित आहे. हे जरा कंटाळवाणं आहे खरं पण मी हे मनापासून स्वीकारलंय. आणि मन रमवण्याचे काही दुसरे मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतो.
3) नकारात्मक विचार - परिस्थिती फारच बिघडत चाललीये.... काय होईल काही कळत नाही... भयंकर भीती वाटतेय.....
सकारात्मक संवाद - ही परिस्थिती मी एकटा बदलू शकणार नसलो, तरी स्वतःला , आणि माझ्या कुटुंबाला या आजारापासून सुरक्षित राखणे हेच " माझं " या राष्ट्रीय आपत्तीच्या निवारणासाठी योगदान आहे. मी स्वतःला आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवीन हे नक्की. आणि असाच विचार सर्वजण करतील तर या आपत्तीचे नक्कीच निवारण होईल.
वर आपण प्रातिनिधिकपणे तीन नकारात्मक anxiety, निर्माण करणारे विचार पाहिले, त्याच्या बरोबरीने दिलेले सकारात्मक स्वसंवाद जर आपण सारखे मनामध्ये घोळवत राहिलो तर निर्माण झालेली anxiety आपोआप नष्ट होऊन , बघा मूड फ्रेश होतो की नाही तो. फक्त हे सारखं मनाशी घोळवत ठेवण्याची सवय महत्त्वाची ......
विचारांच्या शब्द- स्वरूपाचा असा सुंदर वापर करून, आपण आपल्या मनाला कायम सकारात्मकतेशी बांधून राहण्याची सवय लावू शकतो. कोरोनाचं हे संकट तर तात्पुरतंच आहे. ते जाईलच. पण जाताना आपल्याला सकारात्मकतेची गरज, आणि ती विचारात बाणवण्याचे कौशल्य शिकवून जाणार असं व्हायला हवं. मग आयुष्यात कितीही संकटे येवोत, आपण डगमगणार नाही हे खरं.....
--प्रा. विवेक दसरे.
मार्ग समुपदेशन प्रबोधिनी, अहमदनगर.
9881659901.
- माझ्या नावासह पुढे पाठवायला हरकत नाहीच.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Ahmednagar
414003
Opening Hours
| Monday | 9am - 11am |
| 5pm - 8pm | |
| Tuesday | 9am - 11am |
| Wednesday | 9am - 11am |
| 5pm - 8pm | |
| Thursday | 9am - 11am |
| Friday | 9am - 11am |
| 5pm - 8pm | |
| Saturday | 9am - 11am |
| Sunday | 9am - 1pm |